सेनगाव तालुक्यातील घटना कौटुंबिक वादातून वडिलांचा खून करणाऱ्या दोन मुलांना जन्मठेपेची शिक्षा हिंगोली न्यायालयाचा निर्णय
हिंगोली-: सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथे घडलेल्या कौटूंबीक वादातून जन्मदात्याचा दोन मुलांनी खुन केल्याने दाखल झालेल्या दोषी ठरलेल्या दोन्ही मुलांना जिल्हा न्यायालयातील तदर्थ जिल्हा न्यायाधिश पी.जी. देशमुख यांनी आजीवन कठोर कारावासाची शिक्षा सुनावली.
याबाबत जिल्हा सरकारी वकील एन. एस. मुटकुळे यांनी दिलेली माहिती अशी की, पानकनेरगाव येथे निखील संजय देशमुख, गजानन संजय देशमुख यांनी जुन्या कौटूंबीक वादातून वेळूची काठी, लाकडी रॉफ्टर, लाकडी पाटाने संजय आबाराव देशमुख यास त्यांच्या दोन्ही मुलाने ४ जून २०२२ रोजी जबर मारहाण केल्यामुळे ते बेशुध्द पडले होते. यावेळी त्यांच्या पायाजवळ पोत जाळून दुखापत करून प्रेताची विल्हेवाट लावून पुरावा नष्ट केल्याबाबतची तक्रार सेनगाव पोलिस ठाण्यात शिवाजी आबाराव देशमुख यांनी ६ जून २०२२ रोजी दिली होती. त्यावरून निखील संजय देशमुख, गजानन संजय देशमुख या दोन्ही मुलावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलिसांनी करून हिंगोली जिल्हा न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. २४ नोव्हेंबर रोजी तर्द्थ जिल्हा न्यायाधिश पी.जी. देशमुख यांनी दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकुन गुन्ह्यातील निखील संजय देशमुख, गजानन संजय देशमुख यांना दोषी ठरवत.
कलम ३०२ भादवी प्रमाणे आजीवन कठोर कारावास तसेच प्रत्येकी ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने कारावास, कलम २०१ सहकलम ३४ भादवी प्रमाणे ३ वर्ष कठोर कारावास तसेच प्रत्येकी ५०० रुपये दंड, दंड न भरल्यास ८ दिवस कारावास, कलम ५११ सहकलम ३४ भादवी प्रमाणे १० वर्ष कठोर कारावास तसेच प्रत्येकी २ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना कारावास आणि एकुण आकारण्यात आलेल्या १५ हजारापैकी १० हजाराची रक्कम मयताची आई लक्ष्मीबाई आबाराव देशमुख यांना भरपाई म्हणुन देण्याचे आदेश दिले. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील एन.एस. मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक सरकारी वकील श्रीमती एस.एस. देशमुख यांनी बाजू मांडली. त्यांना सहाय्यक सरकारी वकील एस.डी. कुटे यांनी व कोर्ट पैरवी पी.ए. मारकड यांनी सहकार्य केले.













