🔴खरा कायदा न्युज नेटवर्क🛑
कळमनुरी तालुक्यातील तेलंगवाडी शिवारात बिबट्याने दोन शेळ्यांची शिकार केल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पोतरा परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्या फिरत असल्याच्या चर्चा सुरू होत्या; मात्र वन विभागाने त्या अफवा असल्याचे सांगितले होते. परंतु ११ डिसेंबरला काशिनाथ नारायण मोदे यांच्या शेतात घडलेल्या घटनेनंतर ग्रामस्थांचा संताप वाढला आहे.
घटनास्थळी वन विभागाचे कर्मचारी दाखल होऊन पाहणी केली. तरीही बिबट्याच्या सततच्या हालचाली असूनही कोणतीही ठोस कारवाई न केल्याबद्दल ग्रामस्थ नाराजी व्यक्त करत आहेत. वसंतराव कोंडबाराव मुलगीर यांनी सांगितले की, पंधरा दिवसांपूर्वी पिंजरा असलेले वन विभागाचे वाहन त्यांच्या शेताजवळ दिसले होते. “तेव्हा बिबट्याची कल्पना नव्हती. आता मात्र वाटतंय की बिबट्या मुद्दाम सोडला असावा. गेल्या पंधरा दिवसांत कुत्रे व शेळ्यांवर हल्ले झाले तरी विभागाची कारवाई दिसत नाही,” असे त्यांनी सांगितले.
यावर वनपाल शिवाजी काळे यांनी नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले. “परिसरात बिबट्या असल्याची खात्री आहे. पण अफवांवर विश्वास ठेवू नये. शेतकरी व पशुधनाच्या सुरक्षेसाठी सावधगिरी बाळगावी आणि रात्री एकटे बाहेर पडू नये,” असा सल्ला त्यांनी दिला.
दरम्यान, तेलंगवाडी, निमटोक आणि पोतरा परिसरात सलग घडणाऱ्या घटनांमुळे भीतीचं सावट अधिक गडद होत असून वन विभागाकडून ठोस कारवाईची मागणी जोर धरत आहे.












